*समाजाने अाता बदललेच पाहिजे*

*समाजाने अाता बदललेच पाहिजे*
====================
१. डोंगर, जंगल, नदी, चौक, गल्ली, शहर, गांव सगळीकडे मंदिरे पुष्कळ आहेत. नवीन मंदिरं उभारणी बंद करा. वर्गणी देऊ नका. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.

२. दिंड्या, वा-या, सप्ताह यात सहभागी होऊन पापमुक्ती व मोक्षप्राप्तीच्या नादात व्यक्ती आपल्या प्रगतीचे (वेळ-पैसा-श्रम) चक्रच मारून टाकतो. पैसा व बुध्दीचा अपव्यय होतो. कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा.

३. 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा.

४. शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.

५. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील.

६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा. 

७. सर्व जाती-धर्मांचा आदर करा. जातीवादाला आपली जगण्यात स्थान देऊ नका आणि धर्मांधांच्या नादीही लागू नका.

८. मोडेल पण वाकणार नाही, या स्वभावात आता बदल करा. काळ खूप बदलला आहे, याचे भान असू द्या. (महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती - संत तुकाराम)

९. आपसातील आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झालेय. आता बदला म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याण होईल.

१०. कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात/नोकरीत/व्यवसायात राहा. किमान ८ तास काम करा... (कुठल्याही क्षेत्रात प्रगती होईलच).

११. पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा. (एकमेका साह्य करू).

१२. नियोजन व काटकसर करून आहे त्या उत्पन्नात आनंदाने जीवन जगता आले पाहिजे. मोठेपणाच्या नादात कर्जबाजारी होऊ नका. 

१३. यात्रा, जत्रा, सत्यनारायण, वास्तुशांती, जागरण, गोंधळ, लग्न समारंभ, डोहाळेजेवण (ओटीभरणे), पाचवी, बारसे, तेरावे, गोडजेवण आता बंद करा. वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळा, एकमेकांच्या घरी गेल्यावर व लग्नात गेल्यावर अहेर देणे बंद करा, यात फक्त व्यापारी वर्गाचा फायदा आहे. २००-३०० रुपयाची साडी आजकाल कोणी घालत नाही, मग कशाला उगाच असा खर्च करायचा. पुजा-यांचे व्यवसाय चालविणेही बंद करा.

१४. भांडकुदळ, लबाड, पैसे बुडवणाऱ्या लोकांपासून चार हात लांब रहा आणि मदत करणा-याचे कायमच ऋणी रहा.

१५. घरातील महिलांना सन्मानाची  वागणूक द्या. मुलींना उच्चशिक्षित करा.

१६. महिलांना मंदिरं, उपासना, कर्मकांड यातून बाहेर काढा आणि प्रबोधन, उद्बोधन असलेल्या कार्यक्रमाला सोबत न्या. त्यांच्या हातातील पोथ्या-पुराणांची पुस्तके फेकून द्या आणि मानवी इतिहासाची, विज्ञानाची, विचारवंतांची पुस्तके द्या.

१७. कर्मकांड करणे टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो. पुरोहितगिरीच्या आहारी जाऊ नका. तुमच्या ग्रह-नक्षत्रांची शांती ही केवळ एक फसवेगिरी आहे आणि पुरोहितांसाठी ती 'रोजगार हमी योजना' आहे. त्यांच्या बिनामेहनत कमाईचे ते साधन आहे. असल्या फसव्या षडयंत्रात अडकू नका. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण ऐकतो व त्याचाच ते फायदा घेतात. ही पूजा करा, तिकडे नारायण नागबली करा, अमुक शांती करा... आणि त्यांचे ऐकण्याच्या नादात अनेकांना स्वतःचे घर विकावे लागते.

१८. आपण कमविलेल्या पैश्यातूनच आपल्या कुटुंबाला खूष ठेवा.

Comments