महाड दरड दुर्घटनांत १००हून अधिक बळी

 महाड दरड दुर्घटनांत १००हून अधिक बळी

ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून थैमान घालणार्‍या महापूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांत आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा बळी गेला असून, अद्यापही  लोक बेपत्ता आहेत. पावसाने थोडी ओढ घेतल्याने बचाव कामास वेग आला असून, काही लोक अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. आज तळीये येथे १६ जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. त्यामुळे एकूण संख्या ५२ इतकी झाली आहे.

महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून तब्बल ३२ घरे दगड-मातीच्या ढिगार्‍याखाली गडप झाली. गावात जवळपास ४२ घरे असून, जवळील डोंगराचा एक भाग गुरुवारी संध्याकाळी त्यांच्यावर पडल्याने सर्व जण ढिगार्‍याखाली गाडले गेले. 

दरम्यान, तळीये गाव म्हाडा च्या मदतीने पुन्हा उभारण्यात येणार आहे. येथे पक्की आणि टिकावू घरे म्हाडातर्फे उभारण्यात येतील, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

महाड तालुक्यातील तळीये गावात एनडीआरएफ आणि पोलिसांच्या मदतीने स्थानिकांनी आतापर्यंत ५२ जणांचे मृतदेह बाहेर काढले असून, अद्याप किमान ३५ ते ४० जण बेपत्ता आहेत. 

खेड पोसरे येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गाडल्या गेलेल्या १७ जणांचे मृतदेह काढण्यात आज यश आले.

सातारा जिल्ह्यातील मिरगाव आणि आंबेघर येथील दुर्घटनांत २६ जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी आणखी सात जणांचे  मृतदेह सापडले आहेत.




Comments