मोदीजींच्या लोकप्रियतेची सहा रहस्ये..

 मित्रांनो डोक्यात द्वेष भावना न ठेवता अतिशय प्लेन माईंड ने एक वेळेस अवश्य वाचा. काही कळत आहे का, लक्षात येत आहे का..? बघा.



मोदीजींच्या लोकप्रियतेची सहा रहस्ये...

भारतात आजवर अनेक लोकप्रिय नेते होऊन गेले. पण या सगळ्यांच्या लोकप्रियतेचे विक्रम नरेंद्र मोदींनी मोडीत काढले आहेत असं म्हणता येईल. आणि काही मूठभर द्वेष्टे सोडले तर हे कोणी नाकारणारही नाही. 

स्वतंत्र भारतात इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. 'आजवरचे सर्वोत्तम पंतप्रधान कोण' या वेळोवेळी होत असलेल्या सर्वेक्षणात या दोघांनाच आलटून पालटून पसंती मिळत आली. पण त्यांची अप्रूव्हल रेटिंग्ज कधी 40-45 टक्क्यांच्या पुढे गेली नाहीत. 

इंडिया टुडेने नुकत्याच घेतलेल्या ' मूड ऑफ द नेशन पोल ' मध्ये मोदींना असलेला लोकांचा पाठिंबा 70 - 90 टक्क्यांपर्यंत जाऊन पोचला आहे ! हे ऐकून राजदीप सरदेसाईला बसलेला धक्का आणि झालेली चिडचिड बघण्यासारखी होती.

2014 आणि 2019 मध्ये वाढत्या बहुमताने निवडून आलेल्या मोदींची लोकप्रियता कोविड आणि चिनी आक्रमणाच्या काळातही सतत वाढतच आहे आणि आता विक्रमी पातळीवर पोचली आहे.  इतकंच नव्हे तर भारताबरोबरच जगभरही मोदी खूप लोकप्रिय आहेत. परदेशी प्रवास करताना, तिथली सर्वसामान्य माणसं ज्या कुतूहलाने आणि आदराने मोदींबद्दल बोलतात ते ऐकण्यासारखं असतं. यामुळे भारताबरोबर, जगातल्या इतर लोकशाही देशांमधील निवडणुकांमध्येही मोदी ' गेमचेंजर ' ठरू लागले आहेत. इस्रायलमधील निवडणुकीत नेतान्यहूंनी मोदींची होर्डिंग्ज लावली होती. अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या प्रचारात ट्रंप त्यांच्या मोदींबरोबर असलेल्या व्हिडिओज् चा भरपूर वापर करत आहेत. 

या न भूतो न भविष्यती अशा लोकप्रियतेमुळे मोदीद्वेष्टा स्यूडो लिबरल कंपू हादरून गेला आहे आणि त्याहीपेक्षा भंजाळून गेला आहे.  यामुळे मोदींच्या अचाट लोकप्रियतेची तर्कशुद्ध कारणमीमांसा करणं त्यांना जमेनासं झालं आहे.

हे सहाजिकच आहे. काहीही केलं तरी मोदींच्या लोकप्रियतेला धक्का सोडा, त्यावर साधा ओरखडा काढणंही त्यांना जमत नाहीये.  लाॅकडाऊनच्या दरम्यान हजारो मायग्रंट वर्कर्स आपल्या गावी पायीच जायला निघाले तेंव्हा स्यूडो ब्रिगेडच्या आशा एकदम पल्लवित झाल्या. राज्य सरकारांना या वर्कर्सना आश्वस्त करण्यात आलेल्या अपयशाचं खापर मोदींच्या डोक्यावर फोडून वातावरण तापविता येईल  या आशेने त्यानी मीडियातून एकच एल्गार सुरू केला. त्यावेळी दोन तरूण मुलांचा एक व्हिडिओ मी पाहिला होता. ते म्हणत होते, " हम सातसो किलोमीटर चल के आये हैं. और भी जाएंगे.  लेकिन हमें मोदीजी से कुछ नहीं मांगना हैं. वे बस देश को सम्हाल लें." लोकांचा हा अजोड विश्वास ही मोदीजींची खरी शक्ती आहे. ज्यांना हे सत्य स्वीकारायचंच नाही, ते " हा सगळा प्रोपोगंडा आहे " अशी स्वतःचीच समजूत काढून आपला वैचारिक गोंधळ सुरू ठेवतात.

या गोंधळातूनच ते मोदींच्या लोकप्रियतेची स्वतःला ऐकायला बरी वाटतील अशी कारणं शोधू लागतात.  यात ईव्हीएमपासून धार्मिक पोलरायझेशन व मीडियापर्यंत अनेक कारणांचा समावेश असतो. यातलं इव्हीएमच्या हास्यास्पद कारणावर न बोललेलंच बरं. पण धार्मिक पोलरायझेशनमुळे भाजप निडून येत असेल तर राज्यांच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा का चालत नाही, हा प्रश्न या मंडळींना पडत नाही. त्याचं कारण असं की राज्यांच्या निवडणुका मोदींना निवडण्यासाठी नसतात. जेंव्हा मोदींना केंद्रात निवडून देण्यासाठी मतदान होत असतं तेंव्हा ते फक्त  त्यांच्याकडे बघून, त्यांच्यासाठी म्हणून होतं व यश मिळतं. धर्म, जात वगैरे सगळं तिथे दुय्यम ठरतं. म्हणूनच दलित व आदिवासींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघांमध्ये सर्वधिक खासदार भाजपचे निवडून येतात, तर मुस्लिम बहुसंख्य असलेल्या मतदारसंघातही भाजपला बर्‍यापैकी यश मिळतं. अर्थात ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे त्यांना यातलं काहीच दिसत नाही.

मीडियाचाही तोच प्रकार. टाईम्स नाऊ, रिपब्लिक सारखी काही चॅनल्स 

मोदींना समर्थन देतात हे खरं असलं तरी एनडीटीव्ही, इंडिया टुडे, मिरर टुडे सारखी चॅनेल्स मोदी विरोधकही आहेत. आता, मोदीसमर्थक चॅनल्सना मोदीविरोधक चॅनेल्सपेक्षा खूप अधिक प्रमाणात प्रेक्षकवर्ग लाभतो त्याला काय करणार? यातून एकच अर्थ निघतो. चॅनल्समुळे मोदींचा होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त फायदा मोदींमुळे चॅनल्सचा होतो. पुन्हा  एक कटू सत्य! 

वृत्तपत्राचं म्हणाल तर तिथे मोदीविरोधकांचाच भरणा आहे. महाराष्ट्रात पाहिलं तर सगळी मराठी वृत्तपत्र पूर्णतः मोदीविरोधी आहेत. त्यांचे लेख व स्फुटं सोडा बातम्यांमध्येही मोदीविरोध ठासून भरलेला असतो. सोशल मीडियातील तथाकथित मोदीभक्तांबद्दल खूप आरडा ओरडा केला जातो. पण खरंतर सोशल मीडिया हे सगळ्यांसाठी खुलं माध्यम आहे. तिथे मोदी समर्थक जसे व्यक्त होतात तसेच मोदीविरोधकही. आता, समर्थकांची संख्या विरोधकांपेक्षा खूप जास्त असेल तर तो मोदींच्या लोकप्रियतेचा परिणाम आहे. कारण नव्हे!

याचा अर्थ, धार्मिक विभाजनासारखंच, मीडियावरील प्रभुत्व हे देखील मोदींच्या लोकप्रियतचं खरं कारण म्हणता येणार नाही. नमोरुग्णांसाठी ते कितीही सोयीचं असलं तरी !

मग काय आहे मोदींच्या लोकप्रियतेचं खरं रहस्य ? ब्रँडस् आणि त्यांची लोकप्रियता यांच्या गेल्या तीस वर्षांच्या अभ्यासातून मला जाणवलेली सहा रहस्य अशी. ( ही खरंतर साधी-सरळ-स्पष्ट अशी कारणं आहेत. पण द्वेषाने आंधळे झालेल्यांना ती दिसत नसल्यामुळे ती रहस्य ठरली आहेत !) -

1. निःस्वार्थ साधक -

त्यांच्याच शब्दात सांगायचं तर मोदी हे एक फकीर आहेत. मुलंबाळं आणि नातेवाईकांच्या गोतावळ्याची त्यांच्या राजकारणात आणि राज्यकारभारात कसलीही लुडबुड नाही.

 वारसाहक्काने चालणाऱ्या खासगी कंपन्यांसारखे इतर सर्व राजकीय पक्ष बघता ही तत्वनिष्ठा लोकांना मनापासून भावते.

त्यांची आई, भाऊ-बहिणी व इतर नातेवाईक ज्या साधेपणाने व सर्वसामान्य परिस्थितीत राहतात तेही देशानं पाहिलंय. बारा वर्षे मुख्यमंत्री व सहा वर्षे पंतप्रधान राहिलेल्या माणसाच्या या साधेपणाची व स्वच्छ चारित्र्याची तुलना सहाजिकच वर्ष-दोन वर्ष काॅर्पोरेटर राहिल्यानंतर एसयुव्ही उडवणाऱ्या गावोगावच्या राजकारण्यांशी, आणि मिळेल ते, मिळेल तिथे ओरबाडणार्या व पिढ्यान् पिढ्यांची सोय करून ठेवणाऱ्या सत्तधारी घराण्यांशी केली जाते.

भारतीय जनमानस साधू, संत, फकीर यांना सर्वोच्च स्थानी ठेवतं. त्याग हे सर्वोच्च मूल्य मानतं. कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसलेल्या, निस्वार्थी, निःसंग मोदीजींवर भारताचं अपार प्रेम आहे ते यामुळेच !

2. प्रखर राष्ट्रवाद

एक हजार वर्षांची आक्रमणं, अपमान, अवहेलना आणि गुलामगिरी यामुळे भारतीय माणसाचं मन खोलवर कुठेतरी दुखावलं गेलं आहे. 

स्वातंत्र्यानंतरही भारतीय संस्कृती, परंपरा यांची उपेक्षा, अवहेलना, कुचेष्टा  चालूच राहिली. पाश्चात्य ते चांगलं असं मानणाऱ्या आपसातील हितसंबंधांनी बांधल्या गेलेल्या उच्चभ्रू वर्तुळातच खरी सत्ता फिरत राहिली. आपल्या भाषेत बोलणार्या, जमिनीवर पाय असलेल्या, मातीत काम करणाऱ्या सच्चा भारतीयांसाठी 'परदेशी साहेबाच्या जागी देशी साहेब आला' एवढाच बदल झाला.

मोदींमध्ये त्यांना 'इंडिया फर्स्ट' चा नारा देऊन आपली भाषा, आपली वेशभूषा, आपल्या परंपरा, आपली संस्कृती यांचा सन्मान करणारा 'आपला' नेता भेटला. ज्याने त्यांना त्यांच्यातलाच एक  सर्वसामान्य 

' चायवाला ' सर्वोच्च स्थानी पोचू शकेल असा 'नवा भारत' आल्याचा विश्वास दिला. जिथे 'बर्थ ' नव्हे तर 'वर्थ' पाहिली जाईल अशा भारताचं दर्शन त्यांना झालं मोदीजींच्या व्यक्तिमत्त्वात.

रामलल्लाच्या आणि केदारनाथाच्या पायाशी बसण्यात न्यूनगंड न मानणारा, अमेरिकेतही नवरात्रीचे कडक उपास करणारा, गंगाघाटावर आरती करणारा हा नेता त्यांना 'आपला', आपल्या मातीतला वाटला.

देशातली, तसंच परदेशातली धोरणं ठरविताना 'कोण काय म्हणेल ' याचा विचार न करता फक्त आणि फक्त देशहिताचाच विचार करणार्या मोदींना देशाचा संपूर्ण विश्वास लाभला.

3. 56" छाती !

कुठल्याही स्वाभिमानी भारतीय माणसाला आजवर डाचत आलेली गोष्ट म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांचा न्यूनगंड आणि त्यातून येणारी बोटचेपी, पडखाऊ धोरणं. सहा अतिरेकी मुंबईत येऊन रक्ताचे सडे घालतात आणि आम्ही काहीच करत नाही. मूठभर अतिरेकी आमच्या संसदेवर हल्ला करतात आणि आम्ही काहीच करत नाही. आमच्याच पैशावर पोसलेले हुरियत काॅन्फरन्सचे लोक उघडपणे पाकिस्तानचा अजेंडा राबवतात आणि आम्ही काहीच करत नाही. चीन उठसूट घुसखोरी करतो, आणि आम्ही सीमाभागात पायाभूत सोयी निर्माण करण्याची हिम्मतही दाखवत नाही... भारताला असह्य झालेला हा कचखाऊपणा एकदाचा झुगारून देण्यासाठी लागणारा कणखरपणा, धैर्य आणि निर्णयक्षमता दाखविणारा नेता म्हणजे मोदी. 

सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, अभिनंदनच्या सुटकेसाठी घेतलेली कणखर भूमिका, चीनला लडाखमध्ये दिलेला अनपेक्षित दणका, देशाच्या उरात काट्यासारखं रुतून बसलेलं 370 कलम काढून टाकण्याचा ठाम निर्णय ... या आजवर अशक्य वाटणाऱ्या कणखर निर्णयांमुळे मोदी देशाच्या गळ्यातले ताईत झाले. आणि या प्रत्येक वेळी 'पुरावे दाखवा ' सारख्या तद्दन मूर्खपणाच्या भूमिका घेऊन विरोधी पक्ष लोकांच्या मनातून पुरते उतरले.

4. अंत्योदयाची प्रभावी अंमलबजावणी

अभिमानाशी आणि भावनेशी निगडित मुद्दे महत्वाचे असले तरी सदासर्वकाळ त्यांच्यावर अवलंबून राहता येत नाही. लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक केल्याशिवाय टिकाऊ लोकप्रियता मिळत नाही. आणि हे मोदींच्या लोकप्रियतेचं सगळ्यात महत्वाचं आणि विरोधकांच्या पचनी न पडणारं कारण आहे.

'तळातील शेवटचा माणूस' हा मोदींनी आपला फोकस ठेवला आहे. त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणाऱ्या 'स्वच्छ भारत', 'आयुष्यमान भारत', 'उज्वला योजना', 

'प्रधानमंत्री आवास योजना' यासारख्या अनेक योजनांची आखणी केली आहे. आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर द्वारे या योजनांचा खराखुरा लाभ लाभार्थ्यांपर्यंत थेट पोचविण्याची चोख व्यवस्था केली आहे. 

या प्रत्यक्ष अनुभवामुळे तळागाळातील गोरगरीब जनतेची मनं मोदींनी जिंकली आहेत. 

 लाॅकडाऊनच्या काळात 80 कोटी लोकांना तीन महिन्याचं मोफत रेशन थेट पोचविल्यामुळे इतक्या भयानक अडचणीच्या काळातही देश तग धरू शकला. आपल्या देशातील जगड्व्याळ अडचणींचा विचार करता हा चमत्कारच म्हटला पाहिजे.

 हा वर्ग बोलका नसल्यामुळे हे फारसं बोललं जात नाही. पण मतदानकेंद्रांवर व्यक्त होतं आणि द्वेष्ट्यांना भंजाळून टाकतं !

5. प्रभावी संवाद कौशल्य -

मोदी हे देशातील सर्वाधिक प्रभावी वक्ते आहेत. कुठे, काय, कसं आणि किती बोलायचं हे त्यांना नेमकं कळतं.

त्यामुळे निवडणूक प्रचारात ते आक्रमक बनतात तर 'मन की बात' मध्ये सगळ्यांची काळजी घेणाऱ्या कुटुंबप्रमुखाचा सूर लावतात. लाल किल्ल्यावरून भविष्याचा वेध घेतात तर राममंदिर भूमिपूजनाच्या प्रसंगी हिंदू संस्कृतीचा गाभा उलगडून दाखवितात. प्रत्येक वेळी त्यांना हवा तो संदेश अचूकपणे पोचवतात !

भाषेवरील प्रभुत्व, विचारांची स्पष्टता, ओघवती शैली... यामुळे त्यांचे भाषण नेहमीच खूप प्रभावी ठरते.

वैयक्तिक संवादातून समोरील व्यक्तीला नीट जोखून त्याच्याशी स्नेहबंध जुळविण्याचं कसब त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ओबामा, ट्रंप, ॲबे, नेतान्याहू यासारख्या जागतिक नेत्यांशी मैत्री साधून भारताच्या व्यूहात्मक धोरणांना ते बळ देऊ शकतात.

संवादकौशल्य हे त्यांच्या लोकप्रियतेचं आणि यशाचं महत्वाचं कारण आहे.

6. देशसेवेचा ध्यास -

देशसेवा हा मोदींचा ध्यास आहे. त्यामुळेच ते गेली अठरा वर्षे एकही सुट्टी न घेता, रोज अठरा तास काम करत आले आहेत. 

परदेश प्रवास करताना वेळ व पैसे वाचविण्यासाठी ते रात्री प्रवास करतात, दिवसभर अनेक मीटिंग्ज करतात व रात्री पुन्हा पुढच्या प्रवासाला निघतात.

देश दिवाळी साजरी करत असतो तेंव्हा ते सीमेवर जवानांबरोबर असतात.

ही बांधिलकी आणि हा कर्मयोग देशाला मनापासून भावलेला आहे.

ही आहेत मोदींच्या विलक्षण लोकप्रियतेची खरी कारणं. ती न स्वीकारता विरोधक स्वतःचं खोटं समाधान करणारी लटकी करणं शोधतात, त्यामुळे मोदींवर हल्ला करण्यासाठी राफालसारखी फुसकी कारणं काढतात आणि पुनःपुन्हा तोंडावर पडतात.

याऐवजी त्यांनी ही कारणं नीट समजून घेतली तर त्यांच्या लक्षात येईल की मोदींवर थेट हल्ला करणं ही चुकीची स्ट्रॅटेजी आहे. ती वापरून राहुल गांधींनी दोनदा सपाटून मार खाल्ला, चंद्राबाबू नायडू नेस्तनाबूद झाले व ममता त्याच मार्गावर आहेत, अखिलेश- माया अडगळीत पडले, नीतिश वेळीच जागे झाले तर केजरीवालांनी सतत मोदींचा उद्धार करणं बंद केलं व सहकार्याची भूमिका घेतली. याऐवजी, मोदींच्या वाटेला न जाता भाजपला इतर प्रश्नावरून घेरण्याची स्ट्रॅटेजी विरोधकांसाठी उपयुक्त ठरू शकेल. पण त्यांचा पराकोटीचा मोदीद्वेष त्यांना असा सारासार विचार करू देईल का, हा खरा प्रश्न आहे.

भारतीयांच्या ह्रदयसिंहासनावर विराजमान झालेले मोदीजी  दिग्विजयी वाटचालीसाठी शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained