लोकमान्य टिळकांचे स्मृती शताब्दी वर्ष

१ ऑगस्ट २०२० हे लोकमान्य टिळकांचे  स्मृती शताब्दी वर्ष आहे.  
गुलामगिरीचे जोखड तोडण्यास देशवासियांना जागृती देणार्‍या या महान सेनानी बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. अखंड भारताचे स्वप्न पाहणार्‍या या महान नेत्याला प्रत्यक्षात ते साकार करण्या इतके आयुष्य लाभले नाही , हे आम्हा भारतीयांचे दुर्दैव ! 
परंतु त्यांचं कार्य आजही आम्हाला मार्गदर्शनकारी आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव आपल्याला उपकारक ठरत आहेत. या उत्सवातुन कार्य करणारे पुढे नगरसेवक , आमदार, खासदार बनत आहेत. अनेकांच्या कलागुणांना इथे वाव मिळत आहे. नाटक सिनेमातुन दिसणारे कलाकार इथेच तयार होतात. जग प्रसिद्ध मंगेशकर बंधु भगिनींनी याच उत्सवातुन आपल्या जिवनाला आकार दिला. अनेक तरुण बेकांरांना इथे रोजगार मिळत आहे. बाहेर कितीही जातीयवाद बोकाळलेला असला तरी इथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करीत आहेत. सरकार जरी या उत्सवाकडे गांभिर्याने पहात नसले, तरी प्रत्येक कार्यकर्ता या उत्सवाचे पावित्र्य आणि गांभिर्य सांभाळण्याचा प्रयत्न करीत असतो. 
लोकमांन्यांचा हा उत्सव आजही समाज घडविण्याचे कार्य करीत आहे. कार्यकर्ते गणेशोत्सवात मश्गुल आहेत , सरकार विधान कार्यात मश्गुल आहेत . गणेशोत्सवातुन वारेमाप पैसा मिळु लागला आहे. सरकारात गाडी, बंगला, भत्ते, नोकर, चाकर यासाठी हपापला आहे . प्रत्येक जण स्वातंत्र्याची मधुर फळे उपभोगत  आहे. पण ज्यांनी हे मधुर दिवस आपल्याला दाखवले त्यांना गणेशोत्सव मंडळे, स्वातंत्र्योपभोक्ते विसरले आहेत. यापैकी कोणालाही टिळकांना शासकीय सन्मान मिळावा असं का वाटत नाही. त्यांच्याही समाधी स्थानाला नाव मिळावे असं का वाटत नाही ?  गीतारहस्या सारखा महान ग्रंथ आज अडगळीत पडला आहे. त्याचे महत्वच कोणाला नाही . ओरायन या खगोल शास्त्रावरील ग्रंथाची कोणी दखलच घेत नाहीत . समाजाचे हे कर्मदरिद्रीपणच नाही काय ? 




लोकमान्यांच्या प्रेरणेने भारतीय स्वातंत्र्य यज्ञात आपले अनमोल शरीर झोकुन दिले, फासाचे दोर गळ्याशी घेतले, यातनादायी तुरुंगवास भोगले, परागंदे होऊन रानोमाळ भटकले, भल्या मोठ्या पगाराच्या सरकारी नोकरीवर लाथ मारली याची जाणीव असलेला भारत कुठे आहे? आजचा कोणताच पक्ष त्या लायकीचा नाही. याला आपण सारेच कारणीभुत आहोत, जबाबदार आहोत ! भारतमातेच्या या लेकरांमध्ये किती मोठा बदल झाला आहे !

 लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात आपण अंतर्मुख होऊ या ! हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल !


Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained