आपण स्वार्थी आहोत की ढोंगी? की दोन्हीही??

आपण स्वार्थी आहोत की ढोंगी? की दोन्हीही??

देशातील बुद्धीजिवी लोकांना माझा प्रश्न आहे -

काँग्रेसी सरकार भ्रष्ट होते म्हणून जनतेने मोदींचे सरकार निवडून दिले. एकदा नव्हे तर दोनदा. अगदी विरोधकांनी खोटेपणाच्या उडवलेल्या राळीला न जुमानता.

६ वर्षे झाली. अजूनही मोदींच्या प्रत्येक निर्णयावर कथित बुद्धीजिवी तुटून पडताहेत ?

मोदी द्वेषाने पछाडलेल्या या लोकांनी खरं म्हणजे संतुष्ट राहण्याची आपली क्षमता गमावून बसली आहे का असं वाटायला लागलंय. 

माझा एक साधा प्रश्न आहे त्यांना - तुमची सहनशक्ती एवढी संपली आहे का? एखादा निर्णय झाल्याबरोबर त्याचे चांगले - वाईट परिणाम दिसण्याआधीच टीकेची झोड उठवली जाते. याच कारणांमुळे बरेच नेते हल्ली कुठलाही निर्णय घेण्याची उत्सुकता दाखवत नाहीत.
 
हा व्यक्ती एका मागून एक धाडसी निर्णय घेवून काही जनताभिमुख सुधारणा आणण्याचा प्रयत्न करतोय - पहिल्या इंनिंग मध्ये नोटबंदी, आर्थिक दृष्ट्या मागास उच्च वर्गांना आरक्षण, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट आणि आत्ता दुसऱ्या इंनिंग च्या पहिल्या वर्षातच 370 कलम रद्द करणे, ट्रिपल तलाख, सी ए ए  असे कितीतरी.

तर बुद्धीजिवी लोक विनाकारण मोदींवर प्रत्येक बाबतीत टीका करून भ्रष्टाचारी लोकांना अनावधानाने का असेना साथ देताना दिसतात. भ्रष्टाचारी लोकांना तर मोदी नकोच आहे. 

पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की, मोदी स्वतः पैसे खात नाहीत आणि कुणाला खाऊ देत नाहीत. या माणसाने १२ वर्षे गुजरातचे आणि गेली ६ वर्षे देशाचे नेतृत्व केले. 
पंतप्रधान असतानाही तो व्यक्ती १४-१६ तास काम करतो, विदेश दौऱ्यात हॉटेलात न थांबता विमानात झोप घेतो, त्याने सहा वर्षात सुटी घेतलेली नाही, त्याच्यावर कुठलाच व्यवहारात पैसे खाल्ल्याचा साधा आरोप नाही,
(राहूल गांधी यांनी केलेले भंपक प्रयत्न कोर्टाने आणि मग जनतेने फेटाळून लावले आहेत). 
स्वतःच्या किंवा कुणा नातलगाच्या नावे मालमत्ता घेतल्याचे आढळलेले नाही, कुठलाही नातेवाईक लाभाच्या पदावर नाही, मंत्रिमंडळात निवडून शक्य तेवढे जादा प्रामाणिक लोक नेमलेले आहेत. सगळे नातेवाईक चरितार्थासाठी १५-२० वर्षापूर्वी करीत होते तीच नोकरी व व्यवसाय करताहेत, त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल दिसत नाही. कोणत्याही राजकीय नेत्यांच्या बाबतीत असं यापूर्वी भारतात घडल्याचं मला तरी माहीत नाही.

अगदी आत्ता सुद्धा कोरोना सारख्या भयंकर महामारीच्या विरुद्ध मोठ्या धैर्याने सामना करत असताना आणि त्यात चीन ने लडाखच्या सीमेवर चालवलेल्या उद्योगांना चोख प्रत्युत्तर दिले असूनही जर दुःखी आत्म्याप्रमाणे आपण अशा व्यक्तीच्या प्रत्येक निर्णयावर तुटून पडत राहिलो तर आपण चांगला म्हणणार कुणाला? 

आपण खुश आणि समाधानी कशाने होणार ? प्रत्यक्ष श्रीराम, कृष्ण किंवा शिवाजी महाराज जरी पंतप्रधान झाले तरी आपण टीकाच करीत राहणार? 

निर्णय घेताच चांगले-वाईट परिणाम दिसण्याआधीच टीका. मग तो देशाच्या सुरक्षेसाठी चा असो किंवा आर्थिक सुधार करण्याचा असो किंवा शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठीचा असो - ह्यांचा एकच कार्यक्रम म्हणजे टीका करा.

उलट मी तर म्हणतो जनतेसाठी काहीतरी करण्याची तळमळ असलेल्या अशा माणसाचा एखादा निर्णय चुकला तरी त्याच्या पाठीशी ठाम रहायला हवे. असे केले नाही तर भविष्यात कोणताही नेता जनकल्याणाच्या गोष्टी सुध्दा करणार नाही. सत्ता मिळाली की आपल्याच सात पिढ्यांचे कल्याण करुन मोकळा होईल.  

मध्यमवर्गीय बुध्दीजीवी लोकांनी आपली विचारसरणी बदलली नाही तर भविष्यात पुन्हा परकीय राजवट किंवा असामाजिक विचारांचे लोक सत्ता बळकावून देशाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. 
काहीही करून भाजपाला दूर ठेवा यासाठी कोठल्याही थराला जायचे हे याच मनःस्थिती ने निर्माण होतात. यानेच केंद्रात देवेगौडा आणि गुजराल किंवा राज्यात कर्नाटक अथवा महाराष्ट्रासारखे प्रयोग जन्माला येतात.

असे होऊन द्यायचे नसेल तर सर्वांनी मोदींजींच्या मागे ठाम पणे उभे राहणे नितांत गरजेचे आहे!

नीट विचार करा !

@ दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained