दिवसातुन दोन वेळा जेवा अवघ्या तीन महिन्यात वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल, डायबेटिस दूर होईल !

सुप्रसिद्ध डायट सल्लागार डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांची जाहीर हमी.

दिवसातुन दोन वेळा जेवा अवघ्या तीन महिन्यात  वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल, डायबेटिस दूर होईल !


दिवसातुन फक्त दोन वेळा जेवा अवघ्या तीन महिन्यात वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल, डायबेटिस दूर होईल, अशी जाहीर हमी, सध्या युट्यूब या सोशल मिडियावर सर्वाधिक लाईक्स मिळविणारे, सुप्रसिद्ध डायट सल्लागार डाॅ जगन्नाथ दीक्षित यांनी येथे बोलताना दिली. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना " स्थूलत्व आणि मधुमेह मुक्ती " या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य सुचित्रा कुलकर्णी, व्याख्यानमालेचे आयोजक आ संजय केळकर, सूत्रसंचालन करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकारी किर्ती आगाशे आदी मान्यवर उपस्थित होते.


कडक भूक लागेल तेव्हा खा, दिवसातुन फक्त दोन वेळा जेवणाचा आनंद घ्या, अगदी पिझ्झा पासून काहीही, कितीही खा, एक पदार्थ खा किंवा दहा पदार्थ खा काहीही फरक पडत नाही, मन मारु नका-हवे ते खा, दोनवेळच्या जेवणाचे स्वतःचे पॅटर्न ठरवा आणि 55 मिनिटांच्या आत मात्र जेवण संपवा, जेवणात गोड कमी खा, साखर-गुळ-मध याचे व्यसन लावू नका, नारळ पाणी प्या पण नारळातली तसेच दूधावरची मलई खाऊ नका, भरपूर पाणी प्या, दुधाचा चहा प्यायचा असेल तर 25 टक्के दूध व 75 टक्के पाणी टाकून प्या पण शक्यतो बिनसाखरेचा चहा घ्या, ग्रीन टी- ब्लॅक टी प्या,  दोन वेळच्या जेवणाच्या मध्ये भूक लागली तर एखादा टाॅमेटो खा, 45 मिनिटात 4.5 मिनिटे चाला, अश्या  आरोग्यासाठी मोलाच्या टीप्स देतानाच डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांनी म्हटले की, सवय नसल्याने सुरुवातीला याचा त्रास होईल पण आठवडाभर नियमितपणे दिवसभरात दोन वेळेच्या जेवणाचे पॅटर्न पाळले की याचीही सवय होईल आणि अवघ्या तीन महिन्यात वजन किमान 8 किलो कमी होईल, पोटाचा घेर किमान 2 इंचाने कमी होईल, टाईप टू चा डायबेटिस दूर होईल, ॲसिडीटी कायमची जाईल, असे डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांनी जाहीरपणे सांगितले.


जेवण वाया कसे घालवायचे यातुन आपल्या देशाच्या महिला लठ्ठ झाल्या आहेत. आपण घरातल्या डसबीनची काळजी करता पण शरिराचे डसबीन केले आहेत त्याची काळजी करत नाही. यामुळेच अनावश्यक वजन वाढते, पोटाचा घेर वाढतो, गुडघेदुखी, स्नायुदुखीचा त्रास उद्भवतो. या चुकीच्या आहारामुळे आता लहान मुलांना टाईप वन चा डायबेटिस होतो तर ज्येष्ठांना टाईप टू चा डायबेटिस होतो आहे. भारतात  20 टक्के लोकांना डायबेटिस आहे. बिनकामाचे इन्शुलिन्स निर्माण झाल्यामुळे डायबेटिस होतो. इन्शुलिन्सची लेव्हल वाढली की शरिरातील पेशी विरोध करतात यामुळे इन्शुलिन्सचे योग्य माप शरिरात निर्माण व्हायला हवे. माप रिकामे झाले की भरायला  55 मिनिटे जातात. रक्तातले ग्लुकोज पेशीत पोहोचते, पेशी ग्लुकोज साठवतात आणि अनावश्यक चरबीच्या स्‍वरूपात निर्माण झालेल्या फॅटी ॲसीडला रोखण्याचे काम करतात. वारंवार खात राहिलात तर इन्शुलिन्स लेव्हल वाढेल. यामुळे दोन वेळा जेवा आणि खाणेपिणे  55  मिनिटात आटोपा. 6 ते 8 तास झोप घेतल्यावर दिवसातुन दोन वेळा जेवताना जेवणाआधी एक तास अगोदर पाणी प्या, जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्या, गरज वाटलीच तर जेवताना घोटघोट पाणी प्या, जेवल्यानंतर एक तास झोपू नये, दुपारी अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपू नये, दिवसातुन तीन ते चार लिटर पाणी प्या, दिवसातुन सव्वा ते दीड लिटर लघवी होईल इतके पाणी प्या असा सल्ला डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला.


आपल्याकडे दोनवेळच्या जेवणाची प्रथा होती. आपणाकडे कधीही नाश्ता करण्याची पध्दत नव्हती. राम-कृष्ण नाश्ता करत असल्याचा उल्लेख पुराणात नाही. आपले पूर्वज नाश्ता करत असल्याचा कोणताही उल्लेख वेदात नाही की ग्रंथात नाही. नाश्ता हा प्रकार ब्रिटिशांनी आणला त्यांनी चहा आणला आणि फुकट वाटला. तेव्हापासून चहा-नाश्ता हा प्रकार सुरु झाला. दिवसातून दोन वेळा जेवा असा उल्लेख आयुर्वेदत आहे. दोन वेळा जेवा पुण्य मिळेल असे आयुर्वेदात म्हटले आहे. जैन धर्मात बेसना ही पद्धत आहे म्हणजे  दोन वेळा बसून जेवा. गौतम बुद्धांनी एकदाच जेवा रात्री जेवू नका असे म्हटले आहे. ग्रीक मधील नागरिक सर्वात तंदुरुस्त समजले जात कारण ते दोनदाच जेवत. आपल्याकडे संतांनी सांगितले आहे की 1 वेळा जेवणारा योगी, 2 वेळा जेवणाच भोगी, 3 वेळा जेवणारा रोगी व 4 वेळा जेवणारा महारोगी. आता यातुन योग्य तो बोध घ्या असे सांगुन डाॅ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले की, कितीतरी खाण्याणे जास्त लोक मरतात पण उपाशी राहिल्याने कोणी मरत नाही. आपण  60 दिवस उपाशी राहू शकतो. आपले पूर्वज शिकार मिळायचे तेव्हाच खायचे नाहीतर उपाशी रहायचे. शालेय विद्यार्थी जागृती अभियानाद्वारे आठवी, नववी, दहावी च्या विद्यार्थ्यांना, "चार वेळा खा, गोड कमी खा, कोल्ड्रींग पिवू नका, मोबाईलवर फुटबॉल न खेळता मैदानावर खेळा, असे विद्यार्थ्यांना सांगत आहोत तर डायबेटिस रिव्हर्स सेंटर द्वारे ठाण्यात दर गुरुवारी सकाळी  8 ते 12 यावेळेत सहयोग हाॅल, घंटाळी येथे मोफत सल्ला केंद्र सुरु केल्याची माहीती त्यांनी दिली.  डाॅ. श्रीकांत जिचकार यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली आणि श्रीकांत जिचकार यांनी सुरु केलेला हा प्रयोग आपण पुढे नेत आहोत, अशी कृतज्ञता व्यक्त करुन, तुमच आरोग्य तुमच्या हाती आहे. मानवतेच्या सेवेसाठी दिवसातून दोन वेळा जेवणाचा प्रयोग सुरु करा, असे आवाहन शेवटी डाॅ जगन्नाथ दीक्षित यांनी केले.


सुप्रसिद्ध डायट सल्लागार डाॅ जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती. यात महिलावर्गात व ज्येष्ठांची संख्या सर्वाधिक होती. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीचे सचिव शरद पुरोहित यांनी डाॅ जगन्नाथ दीक्षित यांचे आभार मानताना याचा आवर्जून उल्लेख केला. वंदेमातरम नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained